काव्यसंग्रहाचे नाव : 'कृष्णार्पित काव्यशिल्प'
9789392914768
शुभेच्छा
आजच्या या समाजमाध्यमांच्या जगात अभिव्यक्ती सहज व सुलभ झाली आहे. आपल्या मनातील भावभावना समाजमाध्यमे एक उत्तम विचारपीठ आहे. आज या समाजमाध्यमांवर आपल्याला लेख, कविता, गाणी इ. गोष्टी मुबलक प्रमाणात वाचायला मिळतात. यांतील अनेक कविता आपल्याला नकळत अंतर्मुख करून जातात. कवयित्री शिल्पाताई वाघमारे (कुलट) यांच्या अशाच मनाला अंतर्मुख करणाऱ्या कवितांची ओळख मला समाजमाध्यमांवरुनच झाली. या माध्यमांवर रोज एवढ्या प्रचंड प्रमाणावर कविता येत असताना शिल्पाताईच्या कवितांनी एक वेगळीच छाप कलारसिकांवर आहे. त्यांची काव्यप्रतिभा व त्यापाठीमागे असलेले त्यांचे संवेदनशील व सर्वसमावेशक चिंतन यामुळे त्यांची कविता सकस व दर्जेदार बनली आहे.
नुसते शब्दांचे इमले रचून उत्कृष्ट कविता रचली जात नाही. शब्दांना जेव्हा कृतीची व चिंतनाची बैठक असते, तेव्हाच कविता ही खऱ्या अर्थाने कविता असते. एक उपक्रमशील शिक्षिका, एक उत्कृष्ट वाचक, संवेदनशील मनाच्या व समाजभान असणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिल्पाताई आणि त्यामुळेच शिल्पाताईची कविता वाचकांच्या मनातील संवेदना जागी करते. त्यांची कविता मानवी मूल्यांवर असणारा त्यांचा विश्वास मांडते. या जगातील नकारात्मक रुढी परंपरांवर त्यांची कविता प्रहार करते हे जग फारच सुंदर आहे आणि याच सुंदर हेतूनं माणूस आपले जीवन सुंदरतेने जगू शकतो
हा की आशावाद त्यांच्या कवितेची प्रेरणा आहे.
आज त्यांच्या या कवितांच्या संग्रहाचे प्रकाशन ATM समूहाच्या माध्यमातून होतो आहे , याबद्दल मनस्वी आनंद होत आहे.
ओलांडून उंबरठा ये बाहेरी
सखे मुक्ताकाशी घे झेंप
मळभ सार सारे अंतरीचे
पुनः नोहे गं संधीची ही खेप...
आपल्या 'सखी तू स्वयंसिद्धा' या कवितेत शिल्पाताईंनी सखी म्हणत... समस्त स्त्री वर्गाचे सामर्थ प्रभावीरीत्या मांडले आहे. हाच आशय व्यक्त करणाऱ्या 'पण'ती' व आदिशक्ती' या कविता आहेत. 'पण'ती" या कवितेतून त्यांनी एकीकडे नवरात्रीतून होणारी नारीशक्तीची उपासना तर दुसरीकडे समाजात वाढत चाललेल्या स्त्री भृणहत्येबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे.
'नव्या युगाच्या उंबरठ्यावर', 'अखंड धागा हो' या कविता मानवी मुल्यांची गरज व्यक्त करतात. 'राममय मन', 'शिवतत्व' 'कृष्णकळी राधा' या कविता त्यांच्या मनातील भक्ती व अध्यात्माचा सुखद सुगंध रसिकांना देतात.
'साऊ तुझ्या लेकी आम्ही
निडर आणि निष्ठावंत...
अमृतस्पर्श तुझा लाभता
युगायुगांची सरली भ्रांत...'
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या कवितेतून सावित्रीमाई फुले यांच्या क्रांतिकारी कार्याची महती सुंदर शब्दांत मांडली आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या महापुरुष व महामायिकांचे गुणगान शिल्पाताईंनी सुंदर शब्दांत गायले आहे. 'शूर संभाजी', 'गर्जा महाराष्ट्र माझा' वीररसातील कविता या महान व्यक्तिमत्वांना समर्पित आहेत.
'बंद कपाटातील पुस्तकाची आत्महत्या' ही कविता आजच्या मोबाईलवेड्या झालेल्या पिढीला वाचन संस्कृतीकडे पुन्हा वळविण्याचे आवाहन करते. 'हरवल्या चिऊची कहाणी' ,'तडका ताजेपणाचा,' असे यावे
वर्ष नवे', 'ध्यास शाश्वताचा', 'भय इथले संपत नाही' या कविता आशयसंपन्न व मनाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत.
खरेतर मी एक साहित्याचा एक सामान्य रसिक वाचक असताना या कवितासंग्रहाला मनःपूर्वक शुभेच्छा देण्याचा मान शिल्पाताईने मला दिला त्याबद्दल धन्यवाद मी त्यांचा आभारी आहे. यासाठी माझ्या शिक्षक भगिनी व उत्कृष्ट कवयित्री आदरणीय सविताताई ढाकणे यांनीही आग्रह केला, म्हणून हा प्रपंच!
आज लिहिते व वाचते शिक्षक दुर्मिळ होत चालले असताना शिल्पाताईसारख्या उपक्रमशील शिक्षिका आपल्या लेखनातून समाजाला नवे भान देण्याचे कार्य करत आहेत, याचा सार्थ अभिमान वाटतो. शिल्पाताई गेली १६ या वर्षे जिल्हा बदलीने अकोला जिल्ह्यात गेल्या याची खंत आम्हा सर्व बीडकरांना आहे. अनेक वर्षे आमच्या गेवराई तालुक्यातील शिक्षण व साहित्य, क्षेत्रात मोलाचे कार्य व सेवा शिल्पाताईनी दिली आहे. इथून पुढेही त्यांचे हे कार्य सुरु राहील व भावना सर्वांना प्रेरणा देत राहतील यात शंका नाही. ATM समुहाने त्यांच्या
'कृष्णार्पित काव्यशिल्प ' या काव्यसंग्रहाला प्रकाशित करून शिक्षक व मराठी रसिकांना हे राष्ट्रधन खुलं केल्याबद्दल ATM म्हणजेच 'कृतिशील शिक्षक महाराष्ट्र 'समुहाची कृतज्ञता व्यक्त करतो अन् समारोप करताना शिल्पाताईच्या 'आई-वात्सल्य सागर' या कवितेतील दोन ओळी उद्घृत करतो.
'शिल्प' साकारले। तुझ्या स्पर्शामृते
प्राण तू फुंकले। पाषाणी या ।।
श्री. धर्मराज करपे
(आदर्श शिक्षक, साहित्यिक व उत्कृष्ट वक्ते) बीड
पाठराखण
मराठी भाषेला दीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे. अतिशय आशयघन कविता लिहीत शेकडो कवींनी मराठीचे काव्य दालन समृद्ध केलेले आहे. या परंपरेत नवनवीन कवी सातत्याने जोडले जात असतात. त्यातील काही ठळक नावं वाचकांच्या लक्षात राहतात. असंच मराठी काव्य प्रांतातील एक उदयोन्मुख नाव म्हणजे कवयित्री श्रीमती शिल्पा वाघमारे.
पेशाने प्राथमिक शिक्षिका असलेल्या शिल्पा वाघमारे यांनी आपल्या काव्य रचनांमधून मानवी मनाच्या संवेदना अचूक शब्दात रेखाटलेल्या आहेत. मानवी जीवन मूल्यांचा उद्घोष करणारी कविता त्यांनी लिहिलेली आहे. तसे पाहिले तर शिल्पाताईंच्या कवितेला विषयाचे बंधन नाही. तरीही त्यांची कविता ही प्रामुख्याने स्त्री जाणिवेतून आलेली दिसते. स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीने समाजामध्ये स्थान मिळालं पाहिजे. तिच्या स्वातंत्र्यावर कसलेही बंधन असू नये, असा आग्रह त्यांची कविता धरते. कवयित्री म्हणते की,
'उंबरठ्याच्या बाहेर ये तू
ओलांडून निर्बंधाचे माप
मागे वळून पाहू नकोस
हात रोखणारे जरी अमाप.'
निसर्ग, अध्यात्म, मानवी नातेसंबंध, शिक्षण, समाजव्यवस्था, मानवी भावभावना इत्यादी विषयांवरही अगदी मोजक्या शब्दांमध्ये अतिशय संपन्न अशी कविता त्यांनी लिहिलेली आहे.
खरं तर काव्य निर्मिती करताना कवी स्वतःलाही उलगडून पाहत असतो. स्वतःचा आणि , सभोवतालचा शोध घेण्याचा प्रयत्न त्याच्या काव्यरचनेतून होत असतो. कलावंताच्या आयुष्यात ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. प्रस्तुत संग्रहातही कवयित्री अगदी डोळसपणे आपला आणि आपल्या भोवतालचा मागोवा घेताना दिसते. आयुष्यातील बरे-वाईट अनुभव घेत असतानाच त्यांचा दृष्टिकोन हा पूर्णतः सकारात्मक असल्याचे शब्दा- शब्दातून दिसून येते, ही बाब महत्त्वाची आहे. आपल्या अल्पाक्षरी रचनांमधून मोठा आशय मांडण्याचं कसब शिल्पाताईंच्या लेखणीत असल्याचे दिसते. त्यांच्या हातून भविष्यातही अशीच साहित्य निर्मिती होत राहो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
डॉ. विशाल तायडे
प्रादेशिक विद्या प्राधिकरण इंग्रजी विभाग प्रमुख, अनुवादक व सुप्रसिद्ध बालसाहित्यिक, छत्रपती संभाजीनगर
'कृष्णार्पित काव्यशिल्प' हा अर्थ, आशय, संवेदना आणि भावनेने भरलेला असा संपन्न काव्यसंग्रह आहे. मनाला हुरहूर लावणारा भूतकाळ यामध्ये अस्वस्थ करतो . कवयित्री शिल्पा वाघमारे यांनी प्रतिभेचे साकार रूप शब्दांशब्दात आकारास आणलेले आहे. कवयित्री आपल्या हळव्या मनाच्या आरस्पानी आरशात आपलाच भूतकाळ पाहून अस्वस्थ होतात.*
"भकास ती ओसरी
नि उजाड अंगण..
तुझ्याविना आला दिस
जाई ग निघून ..."
हरवल्या चिऊची कहाणी ऐकून रसिक हळवा होऊन त्या निरागस चिमणीची व्यथा मनाला लावून घेतो...
कवयित्री आपल्या अनुभवाशी अत्यंत प्रामाणिक आहेत... जे जे पाहिले , भोगले , अनुभवले ते ते त्या शब्दांत गुंफून त्यावर भावनेचे गंधित शिंपण करतात... !
कवयित्री जितकी हळवी आहे तितकीच ती सत्य शिव सुंदरासाठी आग्रही आणि हकदार आहेत.
"ओलाडून उंबरठा ये बाहेरी .. सखे मुक्ताकाशी घे झेप...
मळभ सार सारे अंतरीचे...
पुनः नोहे गं ही संधीची झेप..."
बंडखोर मन जेव्हा मुक्तीची आस मनी धरून आकाशात झेप घेण्याची बंडखोरी रक्तातून उसळू लागते..
"हाक ऐक सखे अंतरीची
बंधने व्यर्थ ती सारी तोड खुणावती तुज सुवर्णसंधी ... का ही आयुष्याशी तडजोड..."
अस्सल प्रतीची स्वत्वाची भूमिका कवयित्रींच्या शब्दशब्दात ओसंडून वाहत आहे...
शिल्पाताई एक प्रतिभाशाली वास्तववादी कवयित्री आहेत त्यांना सोंगाढोंगाचे राजकारण कधीच जमलेले नाही .. जे आहे ते आहे या सिद्धांताचा अस्सल शब्दानुभव आपल्या कवितेतून त्या प्रकाशित करतात..
अलीकडील वीस वर्षांत नवोदित कवयित्रींच्या काव्याचा आई हा आत्मा आहे.. शिकल्या सवरल्या मुली आईच्या आदर्श शुचिर्भूत जीवनाला आपल्या शब्दांचा गंधभरला साक्षात्कार अर्पण करताना दिसत आहेत. शिल्पाताई ह्यांनी "आई वात्सल्य सागर" या कवितेत आईचे महात्म्य सादर केलेले आहे.
"विश्वाचे तू आर्त ।
वात्सल्य सागर ...
रीती मी घागर ।
तुझ्यापुढे..."
आई आकाशा एवढी असते. आणि तिच्यापुढे कन्या रीती घागर असते
आईच्या ममत्वाचे मोल विश्वात सर्वाधिक असल्याचे कवयित्री सांगून तिच्या हृदयात प्रेमाचे सागर असल्याचे कवयित्रींला वाटते...
कवयित्री निसर्ग पूजक आणि निसर्ग सौंदर्याची आसक्त आहे ..
"भय इथले संपत नाही" या कवितेत कवयित्री म्हणतात...*
डोळ्यातील आसवांना मिळेल का रे उसंत...
भुमातेचा माझ्या कुणी चोरला वसंत ...ही अतिशय सुगम, सुंदर आणि सुलभ अशी कविता वाचताना वाचक शब्दांच्या गुंजनात गुंतून जातात.. अशी कविता कधी कधीच प्रसवते आणि जीवनाचे सार्थक होऊन जाते...पुढे कवयित्री म्हणतात...
'माजलेल्या दानवांचा , या भुईला भार झाला...'
'अधमांच्या निर्लज्जपणचा , कळस आज पार झाला.'
अशा काही कविता अर्थ आणि अन्वयार्थाचा कळस गाठतात...*
कवयित्रींच्या लेखणीला अग्निपंखांची धग आहे.*
"क्रांतीज्योती साऊ" हे शीर्षक मनाला खूप खूप भावते .. क्रांतीज्योति सावित्रीबाईंच्या महान कार्याला वाहिलेली अनुपम शब्दांजली म्हणजे ही कविता आहे.
"ज्योती कसली , ती धगधगती मशाल होती ज्ञान क्रांतीची... तमास हरविले असे तिने असे कीं आभा ही लाजली सूर्याची.."
अतिशय अलंकार प्रचुर काव्यरचना अलीकडे लुप्त होत असताना कवयित्रींच्या काव्यात रूपके, प्रतिमा आणि प्रतीके विपुल प्रमाणात रसिकांना अनुभवायला मिळतात.
कवयित्रींच्या काव्याला आणि साहित्याला अत्यंत सुंदर भविष्यकाळ आहे हे सांगण्यासाठी कोणत्याही ज्योतिष्यांची गरज नाही... शिल्पाताई तुमच्या अनुपम, अद्वितीय काव्य प्रतिभेला हार्दिक शुभकामना आणि भविष्यात आपल्या कवितेला साहित्य अकादमी पुरस्कार मिळण्याची अनिवार शक्यता मला शब्दाशब्दांत दिसते... आपण लेखन सातत्य ठेऊन काव्याराधना करत गेल्यास उद्याचे महाराष्ट्र सारस्वत तुम्हाला डोक्यावर घेऊन सन्मानित करेल या विश्वासासह आपणास मनःपूर्वक शुभेच्छा !
डॉ. गोविंद नांदेडे
पुर्व शिक्षण संचालक, पुणे