कृष्णार्पित काव्यशिल्प

  • सर्व काव्यरचना स्वरचित व कॉपीराईट आहेत.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

आठवणीतील गावं

ग्रामीण जीवन*

*आठवणीतले गाव*

माझ्या गावाची रे गड्या 
रम्य मंजूळ ती पहाट 
वासुदेवाच्या मधुर वाणीनं
न्हाते अमृत वर्षावात . . .॥१॥

दिसारंभीच ते श्रवण 
विठू नामाचा गजर 
मन होई रे प्रसन्न 
कर्णमाधुरी तो स्वर. . .॥२॥

भास्करही तो प्राचीचा 
डोकावतो डोंगरातून 
त्याच्या सहस्त्ररश्मींनी 
घालतोया दिव्य स्नान. . .॥३॥

धरणीच्या देहावरी 
जळ झुळुझुळु वाहे
तान्हलेल्या चराचरांची 
नदीमाय वाट पाहे . . .॥४॥

पाखरांची किलबिल 
कुठे मोर ते नाचरे
गंध चंदनी दरवळ 
का न होई मन बावरे. . .॥५॥

येता जाता रामराम 
बंधुभाव ठायी ठायी 
प्रसंगे मग तो वैरीही 
मदतीला धावून येई. . .॥६॥

रक्ताच्या नात्यांहूनही 
मायेच्या त्या शेजारणी 
शुद्ध प्रितीचाच झरा  
सदा वाहे त्यांच्या मनी . . .॥७॥

माझा शेतकरी दादा 
दिन रात्र राबतोयं
न्हातो घामांच्या धारांत 
मोती पीक काढतोयं. . .॥८॥

अवखळ चंचल उनाड 
वारा छेडतो अंगाला
साजनाच्या आठवाने
जीव सखीचा भुलला. . .॥९॥

खरी श्रीमंती सृष्टीची 
खेडेगावाच्या मातीत 
हरवलेला हा सुगंध
शहराच्या डोलार्‍यात. . .॥१०॥

रचना 
शिल्पा म वाघमारे 
स शि मालेगाव खुर्द 
ता गेवराई जि बीड 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: